Thursday, 24 February 2011

माइंड & मीडियानिर्मित कलात्म: द ग्रेट



 चिन्मय दामले
कोणे एके काळी 'कला' या शब्दाला काही एक अर्थ होता. मान होता. गायन, वादन, नृत्य, चित्रकला, शिल्पकला यांना सरकारदरबारी आश्रय होता. कालांतरानं परिस्थिती बदलली. अभिजात कलांना कोणी विचारेनासे झाले. एखाद्या कलेची साधना करणं म्हणजे आयुष्य वाया घालवणं, असा विचार केला जाऊ लागला.
त्यातच शिक्षणपद्धती बदलली. मळलेल्या वाटेवरून जाणं श्रेयस्कर ठरू लागलं. चाकोरीबद्ध आयुष्य जगण्यातच धन्यता मानणारा समाज निर्माण झाला आणि कलेचा आनंद घेणं म्हणजे काय, हेच आपण विसरून गेलो. कलेमुळे जीवन समृद्ध होतं, ही कल्पनाच मागे पडली.
महाराष्ट्र राज्यनिर्मितीच्या सुवर्णमहोत्सवाच्या निमित्तानं ज्येष्ठ पत्रकार श्री. संजय आवटे यांच्या नेतृत्वाखाली माइंड अ‍ॅन्ड मीडियानं 'कलात्म' या अंकाची निर्मिती केली आहे. कला-संस्कृती-शिक्षण यांचा वेध घेणार्‍या या अंकाचे दोन भाग आहेत. अतिथी संपादक आहेत डॉ. श्रीराम लागू. संजय आवटे यांनी अंकाचं संपादन केलं आहे.
'ऐल' आणि 'पैल' अशी या दोन भागांची नावं आहेत. चुकीच्या वाटेनं गेलेली भारतीय चित्रकला आणि त्याचे भोगावे लागणारे परिणाम, या विषयावर ज्येष्ठ चित्रकार श्री. रवी परांजपे यांचा लेख 'ऐल'मध्ये आहे. महाराष्ट्रातील एकूण सांस्कृतिक घडामोडींचा आढावा डॉ. द. भि. कुलकर्णी यांनी घेतला आहे. 'महाराष्ट्रातील संगीतकलेचा रागरंग' हा राजेंद्र मणेरीकर यांचा लेख महाराष्ट्रातील सांगीतिक वातावरणात बदल कसे घडवून आणता येतील, याचा वेध घेतो. तरुण संगीत अभ्यासक चैतन्य कुंटे यानं महाराष्ट्रातील सांगीतिक परंपरेचा आढावा घेतला आहे. उदयन इंदूरकर यांचा 'इथे दगडही झाला जिवंत' हा अप्रतिम लेख महाराष्ट्रातील लेणी व त्यांतील शिल्पकला यांच्याबद्दल सुरेख माहिती देतो. सुधीर नांदगावकर व अरुणा अन्तरकर यांनी महाराष्ट्रातील चित्रपटसृष्टीचा आढावा घेतला आहे. श्यामला वनारसे यांनी चित्रपटकलेच्या शिक्षणाबद्दल मतं मांडली आहेत. जे. जे. कला महाविद्यालयाच्या डीन डॉ. मनीषा पाटील यांची मुलाखतही लक्षवेधी आहे. गुरु-शिष्य परंपरेविषयी प्रियदर्शिनी कुलकर्णी, नृत्यशिक्षणाविषयी शमा भाटे, नाट्यप्रशिक्षणाविषयी प्रवीण भोळे यांनी मांडलेली मतंही या अंकात वाचायला मिळतात. याशिवाय अभिराम भडकमकर, माधव वझे, कमलेश वालावलकर यांचेही लेख या भागात समाविष्ट केलेले आहेत.
'कलात्म'च्या दुसर्‍या भागात डॉ. प्रभा अत्रे, नाट्यदिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, विजय केंकरे, वामन केंद्रे, चित्रकार प्रभाकर कोलते, साहित्यिक रंगनाथ पाठारे, लक्ष्मीकांत देशमुख, महावीर जोंधळे, राजन खान, समीक्षक मुकेश माचकर यांनी त्यांच्या कलाप्रवासाबद्दल मतं मांडली आहेत. पं. सुरेश तळवलकर (तबल्याचं भवितव्य), शांता गोखले (नाटक आणि सेन्सॉरशिप), मीना कर्णिक (मराठी समीक्षक), बाबू मोशाय (मराठी चित्रपटांचं भवितव्य), शाहू पाटोळे (लोककला), डॉ. मंदार परांजपे (बालनाट्य चळवळ), राजश्री पुरंदरे (कलेचे मानसशास्त्र), शाहीर विठ्ठल उमप (लोककला), नीरजा पटवर्धन (वेशभूषा) यांच्या लेखांतून कलेच्या सद्यस्थितीची खरी जाणीव होते. एका वेगळ्या विभागात नीलेश चव्हाण, मंगेश हाडवळे, नागराज मंजूळे, समीर विद्वांस या तरुण कलोपासकांनी आपली मतं मांडली आहेत. 'कलाकारण' या विभागात सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख, रामदास आठवले, गोपीनाथ मुंढे, उल्हास पवार, कृष्णकुमार गोयल यांची मतं व निरीक्षणं वाचायला मिळतात.
'कलात्म'च्या दोन अंकांबरोबरच संपादक श्री. संजय आवटे यांचा 'कला कल्पतरूंचे आरव' हा लेखसंग्रहही प्रसिद्ध झाला आहे. कला व शिक्षण यांचा उहापोह करणारे हे लेख प्रत्येकानं वाचलेच पाहिजेत असे आहेत.

'कलात्म' व 'कला कल्पतरूंचे आरव' मायबोलीच्या खरेदी विभागात एकत्रित उपलब्ध आहेत
- http://kharedi.maayboli.com/shop/Kalatma.html

No comments:

Post a Comment